Friday, 24 July 2020

काळी

#काळी 


            मध्यंतरी मी रस्त्याने जात होते. जरा घाईतच होते. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे असेल पण रस्त्यावर बऱ्यापैकी गर्दी होती.  पुढे गेल्यावर ट्रॅफीक जामच झाला. आता वाट पहाण्याशिवाय पर्याय नव्हता. सहजच आजुबाजुला पाहीलं. बाजूला झोपडपट्टी होती तिथे मुलं खेळत होती. जरा वेळाने त्यांची भांडणं सुरू झाली. एक मुलगा त्याच्या लहान बहीणीला "ए काळे ए काळे" म्हणून चिडवू लागला. ती चिडते हे बघुन त्याला आणखी जोर चढला. शेवटी ती रडायला लागली अन् जवळचं बायकांचा घोळका बसला होता तिथे जाऊन तिने तिच्या आईला सांगीतलं. आई लक्ष देत नाही हे बघनु मुलगी अजुनच जोर जोरात रडायला लागली. किंचाळू लागली तसा आईने तिला धपाटा घातला अन् म्हणाली, "मंग काय झालं कायी म्हनलं त..तु कायीच हाय नं.. तुया आंगाले का भोकं पडले का माय?? जाय तुया भावाले भाकर तुकडा दे." त्या आईने मुलाला रागवायचं सोडुन तिलाच धपाटे घातले. म्हणजे काय? ती मुलगी काळी आहे ही काय तिची चुक आहे का?? काय गुन्हा आहे त्यात तिचा. मुलगा तर मुलगा आई पण तिला काळी म्हणून हिणवत बघुन खूप वाईट वाटलं. असं म्हणतात आईला सगळी मुलं सारखीच असतात. पण ही आई फक्त मुलाची बाजूच घेत नव्हती तर मुलीवर अन्याय देखिल करत होती. तिचा स्वाभीमानही दुखावत होती. काय चूक होती त्या लेकराची?? ती न्यायच मागायला गेली होती ना तिच्या आईकडे?? असे प्रसंग जर वारंवार घडले तर त्या मुलीला नक्कीच नैराश्य येईल.
          हा प्रसंग जरी झोपडपट्टी मध्ये घडला तरी अापणही असे प्रसंग वेळोवेळी अनुभवत असतो. काही लोकं मुद्दाम दुसऱ्यांना खिजवण्या साठी असं काहीतरी बोलतात. "तु एवढा डार्क ड्रेस नको घेऊ तुला नाही चांगला दिसणार" असं चक्क तोंडावर बोलतात. समोरच्याला काय वाटेल, त्याच्या मनाला काय वेदना होतील ह्याचा कधीच  विचार करायचा नाही. कसा करणार?? त्यासाठी संवेदनशिलता असावी लागते. आणि ते अशा थाटात म्हणतात की जसे काही ते स्वत: अप्सरे पेक्षाही सुंदर आणि मोनालीसापेक्षाही नितळ गोरी त्वचा लाभलेलेच आहेत जणू. आणि आश्चर्य म्हणजे यात माणसंही मागे नसतात. समोरच्याचं मानसिक खच्चीकरण करणे हाच उद्देश असतो बहुतेकवेळा. समोरच्याला त्याच्या दिसण्यावरून, उंचीवरून, रंगावरून बोलून काय साध्य करतात लोक तेच काही कळत नाही. 
         एकदा एका लग्नात कोणीतरी एका मुलीला असचं बोलण्याचा प्रयत्न केला तर दुसरी बहीण तिच्यामागे ठामपणे उभी राहीली आणि तिने सगळ्यांना खडसावून सागितलं की, "खबरदार माझ्या बहीणीला असं काही बोलाल तर.. तिची ताई तिच्या मागे खंबीरपणे उभी आहे. तिच्यातले गुण तुम्हाला दिसले नाही का?? की चांगलं बघण्याची सवय नाही डोळ्यांना तुमच्या??" अभिमान वाटला त्या बहीणीचा. समाजात कितीही सुधारणा झाली तरी अश्या वृत्तीचे लोक सगळीकडे दिसतात. मुद्दाम चारचौघात नको असलेले विषय काढून समोरच्याला मेल्याहुन मेल्यासारखं करुन सोडणे हा त्यांचा आवडता छंद असतो. समोरच्याची ऐपत नसेल तर मुद्दाम त्याला खार्चीक सूचना देणे. तू अमुक एक वस्तू  का घेत नाही हे मुद्दाम चारचौघात विचारणे. नाहीतर आमचं इन्कम किती जास्त आहे हे लोकांना कळण्यासाठी सर्वांसमोर त्याचं वर्णन करून सांगणे. कोणाच्या घरात वाद असतील तर मुद्दाम त्याविषयीच प्रश्न विचारणे. कुणाला मुल होत नसेल तर मुद्दाम हळदीकुंकाला त्यावर प्रश्न विचारणे. कुणाचं लग्न ठरत नसेल तर दहावेळा विचारून भंडावून सोडणे ,अगदी समोरच्याला जगणं नकोसं करणे आणि न पटणारी वाट्टेल ती स्थळं सांगणे. ज्याच्याकडे जे नाही त्यावरून त्याला बोलणे हा काही लोकांचा छंदच असतो पण त्याचा समोरच्यावर किती खोल परिणाम होतो याचा ते कधीच विचार करत नाही. (त्याच बरोबर त्यांच्या मनातून तुम्ही उतरता हे ही तुमच्या लक्षात येत नाही.) अशा अनेक कारणांनी लोकांना फ्रस्ट्रेशन येऊ शकतं हे लोकांना कळायला हवं.
        लोकांना इतरांना खिजवून काय मिळतं देवच जाणे पण घरच्याच लोकांनी जर अशी   वागणूक दिली तर मुलांनी दाद तरी कुठे मागायची ??


Saturday, 18 July 2020

मुले

# मुले 


       लहान मुलांशी बोलायला मला खुप आवडतं. त्यांच्याशी बोललं की सगळे टेंशन्स विसरायला होतात. किती गोड असतात मुलं . अन् त्यात आजची पिढी तर खुपच स्मार्ट. फार हजरजबाबी आणि चाणाक्ष. त्यांचं निरीक्षणही खुप असतं. बरेचदा त्यांच्या बोलण्यातून विनोद निर्मिती होते. पण या सगळ्यात आई  वडीलांची कधी कधी फजीतीही होते.
        एकदा आमच्या शाळेतली शिक्षिका तिच्या मुलाला शाळेत घेऊन आली. मुलाचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर आत स्टाफ रूम मध्ये आला जिथे प्राचार्या मिनाझ मॅम पण होत्या. त्यानी त्यांचं नाव एेकलं अन् त्याच्याकडे हातवारे करत म्हणाला,"हिच का ती मिनाझ??" त्याच्या आईच्या पायाखालची वाळूच सरकलीच असेल. अजून काही बोलायच्या आत ती त्याला बाहेर घेऊन गेली.
       एकदा मी गिरणीत उभी असतांना दोन लहान मुले हरभरा डाळ घेऊन आली. साधारण एक किलो असेल. पिशवित डबा ठेऊन दोन्हीकडून दोघांनी पिशवी धरून आणली होती. ते गिरणीवाल्याला म्हणाले, "लगेच दळून द्या आमच्याकडे पाहूणे आले आहेत." तो म्हणाला, "लगेच मिळणार नाही वेळ लागेल" तर ही छोटी मुलं त्याला दमदाटी करू लागली. "ओ मुकाट्याने दळून द्या. पाहूणे आले कळत नाही का तुम्हाला??" बघा ह्यांची कमाल.
        एकदा आम्ही आमच्या नातेवाईकांकडे गेलाे होतो. माझी मुलगी लहान होती. आम्ही सगळे जेवायला बसलो. अचानक ती माझ्या काकांना म्हणाली, "अो आजोबा किती  जेवताय तुम्ही??" आम्ही सगळे बघतच राहीलो. काहीतरी बोलायचं म्हणून काका म्हणाले, "अगं मी सावकाश जेवतोय म्हणून मला वेळ लागतोय." तर म्हणाली, "तुम्ही काय रवंथ करताय का? आवरा की लवकर" आता या मुलांना काय म्हणावं..
         आमच्या बिल्डींगमधली रेवाही तसलीच. एकदा सकाळी शाळेत जातांना बसजवळ कुत्र्याचं पिल्लू तिच्या मागे गेलं. आधीच उशीर झालेला. बसवाले काका घाई करत होते अन् या मॅडम त्या कुत्र्याच्या पिल्लाला ओरडत होत्या, "ए तू माझ्या बस मध्ये यायचं नाही " बोला आता..
      एकदा मी जिन्यातून जातांना मला म्हणाली," आज शाळा नाही का तुमची?" मी म्हटलं ,"आहे की. हि काय निघाले." तर म्हटली ,"आता कसं वाटलं??" म्हटलं ,"छान वाटलं. तू माझी एवढी चौकशी केली तर मला बरच वाटणार ना??" तर म्हणाली, "तुमची ताई कशी मला सारखी विचारते शाळा नाही का शाळा नाही का म्हणून.." म्हणजे तिने माझी चौकशी रागापोटी केली होती. पण हा राग नक्की कोणाचा माझा, ताईचा की शाळेबद्दलचा ते काही शेवट पर्यंत कळलं नाही.
       एकदा तर दोघी बहीणींची भांडणं झाली. रेवाच्या आईने सोडवण्याचा प्रयत्न केला तर ती काठी घेऊन आली आणि सरळ आईला म्हणाली, "तू आधी घराबाहेर हो" बोला आता...काय म्हणायचं या मुलांना??
           आमच्या कडे उन्हाळ्यात रोज रात्री कुल्फीवाला यायचा. पत्ते खेळतांना जो हरेल त्याने सगळ्यांना कुल्फी खिलवायची असा अलीखित नियमच होता. कुल्फीवाल्यालाही सवय झाली होती. एक दिवस काही कारणास्तव कुल्फी घेतली नाही. कुल्फीवाला सारखी घंटी वाजवत होता. माझ्या लहान भाच्याने घरात जाऊन माझ्या आईला सांगीतले. आई म्हणाली, "रोज रोज नाही घ्यायची कुल्फी." इकडे कुल्फीे घेत नाही असे बघुन कुल्फीवाला फाटकाजवळ येऊन जोरजोरात घंटी वाजवू लागला. त्यामुळे भाच्याला खुप संताप आला. तो त्या कुल्फीवाल्याला चिडून म्हणाला, "जावा की आमची आजी नाही म्हण्ती." त्याने आपला राग कुल्फीवाल्यावर काढला पण कुल्फीवाला कुणावर काढणार???
          एकदा एका लग्नात एका लहान मुलाला एक पांढरे केस झालेले काका चिडवत होते की तुझे बाबा म्हातारे झाले. बराच वेळ मुलानी ऐकून घेतलं. मनातून त्याला संताप येत असावा. परत ते काका म्हणाले, "अरे याचे बाबा म्हातारे झाले." मग तो चिडून बोलला, "सी यूवर 'केस' फर्स्ट" अन्  संतापाच्या भरात त्याला केसांना इंग्रजी शब्द आठवला नसावा.
         एकदा एका शाळेत पालकांना बोलावलं. त्यांना वाटलं आपल्या मुलाने नक्कीच काहीतरी चांगलं केलं असणार त्याचं कौतुक करायला बोलावलं असेल. पण शाळेतला किस्सा ऐकून ते उडालेच. त्यांच्या मुलाला म्हणे टिचर रागवल्या म्हणून तो त्यांना म्हणाला, "तुम्ही मला ओरडलात तर मी गोळ्या घालीन तुम्हाला." 
अशी ही मुलं काय बोलतील सांगता येत नाही. 
        एकदा आम्ही ट्रेनने जात असतांना एका सहप्रवाशाचा मुलगा तर खुपच भन्नाट. तो त्रास देतो म्हणून आईने वरच्या बर्थवर बसवलं. एक विक्रेता आला त्याच्या डोक्यावरील बास्केट मधून त्याने कोल्ड्रींकची बाटली वरच्यावर घेऊन फस्त केली आणि आईला आवाज द्यायला लागला, "मम्मी.... मम्मी...." मम्मीने चक्क दुर्लक्ष केलं तर सरळ सांगितलं, " मम्मी मैने कोल्ड्रींक पी लिया है उसके पैसे दे दो." आता काय म्हणणार मम्मीजी?? त्यांचीतर बोलतीच बंद झाली. 
          अशी ही गमतीदार मुले त्यांच्या वागण्याने जसा विनोद निर्माण करतात तसचं कधीकधी पालकांच्या तोंडाचं पाणीही पळवतात.
        
     

सौ. मंजुषा गारखेडकर
पोस्ट आवडल्यास कृपया नावासकट शेअर करावी ही विनंती   

Monday, 13 July 2020

मामाचा गाव - भाग २

#मामाचा गाव - भाग २


भाजी मार्केटला कुणी बाजार म्हणतं कुणी मंडई. पण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. आमच्या विदर्भात त्याला बाजारच म्हणतात. लहानपणी आई बरोबर बाजारात जायला मला खुप आवडायचं. तिथे दिसणाऱ्या विविधरंगी भाज्या बघुन मन कसं प्रसन्न व्हायचं. 
       आमचे आजोबा म्हणजे नानांकडे गेलाे की मी त्यांच्या बरोबर आठवडी बाजारात जायचे. गावाकडचा बाजार तो आठवड्यातून एकदा गुरूवारी भरायचा. नानांचं घर बाजारच्या रस्त्यावर असल्याने सकाळ पासूनच वर्दळ सुरू व्हायची. त्या दिवशी नानाच्या दवाखान्यातही खुप गर्दी असायची. बाहेरच्या वाड्यावस्त्यांवरचे लोक बाजार करायला यायचे. कोणी पेशंट आजारी असले तरी जाऊ बाजारच्या दिवशी म्हणून गुरवारी दवाखान्यात यायचे. काहींची तब्येत नरम गरम असली तर तेही बाजारात आलो तर दाखवून देऊ म्हणून यायचे. त्यामुळे नानांना कधीकधी  जेवायलाही  वेळ मिळायचा नाही. नानांचं दुपारी उशीरा जेवण झाल्यावर आम्ही बाजारात जायचो. तसा बाजार खुप दुर नव्हता पण नानांना गुडघेदुखी आणि वयोमानाप्रमाणे भरभर चालता येत नसे. त्यात अनेक ओळखीचे लोक भेटायचे. "नमस्कार हो डाक्टर सायेब" म्हणून हाक मारायचे अन् विदर्भातल्या त्या टळटळीत उन्हाळ्यात मस्त गप्पा मारायचे. हा भेट तो भेट करत करत बऱ्याच वेळाने आम्ही बाजात पोहचायचो. बाजार चांगला फुलायला लागलेला असायचा. प्रत्येकाची लगबग सुरू असायची आपापलं दुकान थाटण्याची. पालं ठोकून आपापल्या भाज्या नीट मांडून ठेवायच्या , त्यावर पाणी मारायचं सगळं कसं निटनेटकं करून भाजी विकायला बसायचं. विक्रेत्यांच्या लहान मुलांचीही लुडबुड सुरू असायची. बाजार कसा रंगीबेरंगी दिसायचा. हिरव्यारंगाच्या विविध छटा असायच्या. पालकाचा कंच हिरवा तर कारल्याचा पोपटी, गवारीचा वेगळाच. तोंडल्याचा शेडींगचा हिरवा तर कलिंगडाचा काळपट हिरवा. कोथींबीर कुठेही मागे नसायची. बाजुलाच आंब्याचा पिवळाधमक रंग आणि घमघमाट सुटलेला असायचा. आंबेवाले अोरडत असायचे "घ्या रे आंबे व्हा रे लंबे". भाजी घेणाऱ्यांची वेगळीच लगबग चालू असायची. कोणी कोणी भाव करण्यात मश्गुल असायचा. मधेच एखादी वांड गाय येऊन विकायला ठेवलेली पालेभाजी उडवायची. 
           थोडं पुढे गेलं की शेव, चिवडयाची दुकानं असायची. गरमागरम शेव तळणं सुरु असायचं. तळणाचा वास सगळा आसमंत भरुन टाकायचा. शेजारच्या दुकानात आचारी मस्त गरमागरम जिलबी तळत असायचा. त्याच्या आजुबाजुला चारदोन माणसं कागदात  गरमागरम जिलबी खाण्यात मग्न असायचे. आपसात बोलायलाही त्यांना वेळ नसायचा.
       पुढे गेलं की कासाराचं दुकान लागायचं. तिथे बायाबापड्या कोंडाळं करुन बसलेल्या असायच्या. मोठाले घागरे घालून केसांना पुढच्या बाजूला चांदीचे घुंगुरांचे गुच्छ बांधनू पारंपारीक वेशभूषेत कितीतरी बायका बांगड्याच्या दुकानात दिसायच्या. त्या घुंगरांचा एक विशिष्ट मंजूळ आवाज यायचा. लहानपणी त्याचं फारच आकर्षण वाटायचं. दुकानात कितीतरी सुंदर रंगीबेरंगी बांगड्या असायच्या. पण कधी घेऊन मागायची हिम्मत झाली नाही.थोडं पुढे गेलो की विळा, कोयता, शेतीची लहान मोठी अवजारं एका ओळीत मांडून दुकानदार बसलेला असायचा. एका बाजूला कुंभाराकडचे माठ छान रचून ठेवलेले असायचे. उन्हाळ्याच्या दिवसात कुंभाराला उसंत नसायची. त्याच्या कडे सतत गिऱ्हाईक असायचं. मागच्या बाजूला माठ आणायला वापरलेले घोडे, खेचर निवांत शेपट्या उडवत रवंथ करत उभे असायचे. पलीकडच्या बाजूला पकाक पकाक असा कोबड्यांचा आवाज यायचा. तिकडे आम्ही कधी गलो नाही. 
        जसजशी उन्ह कलायला लागायची तसतशी लोकांची गडबड अधिकच वाढायची.आहे तो माल दर कमी करून खपवायचा प्रयत्न असायचा.आता सामानाची बांधाबांध सुरू व्हायची आणि एकेक जण हळुहळु मार्गस्थ व्हायला लागायचा. सगळा बाजार निर्जीव व्हायचा. आम्हीही  परत हळूहळू मार्गी लागायचो.
        बाजारातून आलो की मनाला कसं प्रसन्न वाटायचं. एवढा गोंधळ एवढा कोलाहल असूनही कधीच बाजारात जायचा कंटाळा  यायचा नाही . त्या रंगीबेरंगी बाजाराने आपलं जगही रंगीबेरंगी होऊन जायचं.
         नानांचा स्वभाव बोलका असल्याने अनेक लोकांशी गप्पाटप्पा व्हायच्या. नाना पेशाने डॉक्टर होते. मध्यम उंची , मजबूत बांधा , दिसायला गोरेपान,  तरतरीत नाक आणि हरहुन्नरी. नाना सरकारी नोकरीत असल्याने सारखी बदली व्हायची. रिटायर झाल्यावर देऊळगावला घर घेतलं अन् तिथेच स्थाईक झाले. छोटासा दवाखाना थाटला. नाना फारच उत्साही होते. गुडघेदुखीचा त्रास असूनही रोज फीरायचे. ते स्वत: अनेक औषधे घरी बनवायचे. चवनप्राश, शतावरी कल्प, डोळ्यात घालायचे ड्रॉप्स हे सगळं करायला त्यांनी आईलाही शिकवलं होतं. नवनविन गोष्टी करून पहायला त्यांना खुप आवडायचं. 
        संगीत हा एक त्यांचा आवडता विषय. वयाच्या सत्तरीतही त्यांनी संगीताच्या परिक्षा दिल्या.  त्याना हार्मोनियम वाजवता यायची. बरेचदा ते सकाळी उठुन  गायनाचा रियाज करायचे. सोबत हार्मोनियमही वाजवायचे. त्यांच्याकडे तबलाही होता. कीर्तन तर ते अप्रतिम करायचे. एखादी गोष्ट रंगवून सांगण्याची हातोटी असल्याने कीर्तन खुप रसाळ व्हायचे. एकदा तर गावात दवंडी पिटवली गेली की, "आज देवळात ८ वा. नाना महाराजांचे कीर्तन आहे हो s s s, सर्वांनी ठीक ८ वा देवळात जमा." आम्हाला नाना महाराज कोण ते काही कळलं नाही. नाना ८ वा कीर्तनाला जायला निघाले पण त्यांचं कीर्तन आहे हे त्यांनी सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी अनेक लोकांनी सांगितलं की कीर्तन खूप छान झालं आणि विचारलं की, "नानांचं कीर्तन असून तुम्ही कोणीच का आले नाही?" तेंव्हा कळलं की कीर्तन नानांचं होतं. कधीही स्वत: बद्दल न बोलणारे असे आमचे नाना. 
          नानांचं ड्रॉईंगही अतिशय उत्तम! त्यांना मुर्तीकलाही अवगत होती. बऱ्याच वर्षांपासून दरवर्षी ते घरीच सुबक अशी गणेश मूर्ती घडवायचे.त्याला आकर्षक रंग द्यायचे. जणुकाही मुर्ती साच्यातूनच घडविली आहे असे वाटायचे. सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करायचे. देवपूजाही जेंव्हा करायचे तेंव्हा अगदी समरसून करणार. दरवर्षी रामनवमीला नानांचं कारंजा येथे त्यांच्या रामाच्या देवळात न चुकता दरवर्षी किर्तन असायचं.
        आम्हा नातवंडांचं नानांना खूप कौतुक होतं. माझा मोठा भाऊ इंजिनियर झाला मग त्याची एअर फोर्स मधे निवड झाली तर त्यांना कोण कौतुक वाटायचे. सगळ्या गावाला त्यांनी त्याचं कौतुक सांगितलं असेल. पहिल्याच नातवाचं यश बघुन ते भारावून गेले होते. 
       त्यांच्याकडे बघुन आपल्यालाही कामाचा उत्साह यायचा. त्याच्याकडे बघुन, "म्हातारा  इतुका न अवघे पाऊणशे वयमान" म्हणावसं वाटेल. नाना म्हणजे एवढा उत्साहाचा खळखळता झराच जणू! 
        नानांबरोबर संध्याकाळी आम्ही बसस्टँडवर फीरायला जायचो. रस्त्याने अनेक ओळखीचे लोक भेटायचे. आपुलकीने आमची चौकशी करायचे. गावातले सगळेच लोक चांगले होते. नानांच्या दवाखान्यात जरी आले तरी आई, मावशी यांची चौकशी केल्याशिवाय कधी जायचे नाही. कधी आम्ही आजारी पडलोच तर तांब्याभर दुध घेऊन भेटायला येणार आणि "बाई शहरातल्या पोरी, नाजुक असत्यात त्यांना सवय नसते कामाची, कोनाची तरी दिठ लागली असंल" असं म्हणून कानावर कडाकड बोटं मोडून दृष्ट काढणार. दृष्ट लागणं न लागणं गोष्ट वेगळी पण तो आपलेपणाचा ओलावा तोच मनाला भावतो.
          मला आठवतं मामाच्या लग्नाच्या वेळेला कितीतरी लोकांकडे केळवणाला आम्ही मामा बरोबर जायचो. आपल्या ऐपती प्रमाणे ज्याला जे जमतील ते पदार्थ प्रत्येकाने खाऊ घातले. पण  त्यांची ती आपुलकी, आदरातीथ्य बघुन त्या लहान वयातही भारावून जायचो आम्ही. स्वत: कडे असो नसो देण्याची वृत्ती होती. मन मोठं होतं. आज असे फारच कमी लोक पहायला मिळतात. 
     कोणाकडेही लग्न कार्य असलं की सगळा गाव मदतीला जायचा. जसं काही आपल्याच घरचं कार्य असल्यासारखे कामं करायचे. घरासमोर मांडव टाकून लग्नं व्हायची.  आजूबाजूच्या लोकांकडून भांडी आणली जायची. आजुबाजूच्या बायाबापड्या एकत्र येऊन लग्नातलं जेवण बनवायच्या. एकीचं  उत्कृष्ट उदाहरणच होतं ते. कमी खर्चातही कार्य कसं छान पार पडायचं. एकीचे बळ आपल्या वागण्यातून दाखवून दिलं त्यांनी.
          गावात रोज रात्री मंदिरात हरीपाठ वाचला जायचा. घरातली जुनी जाणती माणसं हरीपाठाला जायची. आमच्या मोठीआईला घरात एवढं काम असूनही ती हरीपाठाला न चुकता जायची. 
        गावातील शिक्षक, गोल गरगरीत माठ, नक्शीदार सुरया, कुंड्या बनविणारे कुंभारदादा, सुबकपणे सगळ्या वस्तू बनवणारे सुतारमामा, लोखंडी घण घालून अनेक वस्तु बनवणारे लोहार मामा, तर ज्वारीच्या धांड्यांपासून बैलगाडी बनवणारी लहान मुले, सगळेच आपापल्या कामात तरबेज. प्रत्येक व्यवसाय जवळून पाहण्याची संधी मिळाली. किती किती गोष्टी बघायला, शिकायला मिळाल्या. देऊळगावसारख्या छोट्या गावाने खुप काही शिकवले. कदाचीत त्या वयात त्याचं महत्त्व कळलं नसेल, पण आज मात्र कळतय. पण तेंव्हाही गाव सोडून जातांना जड मनानेच सोडावं लागायचं आणि आज म्हणाल तर शहरापेक्षा गावाचीच ओढ जास्त वाटते. गावाचा विकास झाला तरचं देशाचा विकास होणार हे नक्की. देऊळगावचा विषय निघाला की या ओळी नक्कीच म्हणाव्याशा वाटतात.
        
           गाव माझा साधा सुधा
               वाहे निर्मळ पाणी

            घरा मध्ये सुख नांदे 
            डोले तुळस अंगणी

             टाळ मृदुंगाच्या तालात
               चाले माऊलीचा जप

              माणसात देव वसे
              देव्हाऱ्यात माय बाप

सौ. मंजुषा गारखेडकर
पोस्ट आवडल्यास कृपया नावासकट शेअर करावी ही विनंती 

Thursday, 9 July 2020

मामाचा गाव भाग १


लहानपणी परिक्षा झाली रे झाली की मामा कडे जायचे वेध लागायचे. त्या आधीच आईच्या पापड, कुरड्या सगळं झालेलं असायचं. नागपूरहून आम्ही पॅसेंजर गाडीने निघायचो. आई, मावशी आणि आम्ही सगळे भावंड सोबत दोन लोखंडी ट्रंका, २/३ हँडबॅग , पाण्यासाठी सुरई किंवा कडीचा तांब्या इ. सगळं सामान घेऊन आम्ही स्टेशनवर दाखल व्हायचो. आमचे वडील आम्ही त्यांना दादा म्हणायचो ते आम्हाला स्टेशनवर सोडायला यायचे. तेंव्हा आज एवढी गर्दी नसायची. सगळं सामान ठेवून बसायला ऐसपैस जागा मिळायची. गाडी सुटली की दादा हात हलवत मागे जातांना दिसायचे. मग गाडीत आमचा धुडगुस सुरू व्हायचा. वरच्या बर्थवर बसून आम्ही पत्ते खेळायचो. दहा वेळा आईला पाणी माग खायला माग, वेळ कसा जायचा ते कळायचही नाही. रात्र झाली की आई बरोबर डब्यात आणलेले पराठे, काचऱ्याची बटाट्याची भाजी अन् ताजे करकरीत कैरीचे लोणचे द्यायची. जेवण झाली की गुडुप झोपायचं की सकाळी जलंब स्टेशनवर गाडी पोहोचलेली असायची. तिथे उतरायचं. प्रवासाचा एक टप्पा पार पडलेला असायचा. आता पुढची गाडी पकडणे हे उद्धीष्ट असायचं. ती गाडी कधीच वेळेत नसायची. वेळ मिळाला की डुलत डुलत यायची स्टेशनात. १०/११ वाजता त्यात बसलं की पुढचा प्रवास सुरू. सोबत आणलेल्या चिवडा आणि कणकीचे शंकरपाळे प्रवासात कधी फस्त व्हायचे कळायचं देखिल नाही. मग खामगाव आलं की उतरायचं. आता एस टी स्टँड वर जावं लागायचं. एकाने सतत एस टी च्या मागावर रहायचं. कोणी सांगितलं देऊळगावची एस टी आली की सगळ्या सामाना सकट धक्का बुक्की करत कसं बसं एस टी त चढायचं. जागा मिळेल याची कधीच शाश्वती नसायची. आत शिरायला मिळालं हेच महाभाग्य. दिवसभरातून एकच गाडी देऊळगावला जायची अन् ती ही गेली तर बोंबला. बरं त्या गाडीत चढतांना नेहमीच आमची सुरई फुटायची. देऊळगावचे रस्ते म्हणाल तर इतके भयंकर की शरीरातलं एकही हाड खिळखिळं झाल्याशिवाय रहाणार नाही. वाट पाहून पाहून कंटाळून डुलकी लागली की आई उठवायची चला आपल्याला उतरायचं आहे. संध्याकाळ झालेली असायली. मग सगळं सामान गोळाकरून एस टी गच्चकन थांबली की कोंबलेल्या त्या एसटी तून एकेकानी बाहेर येत मोकळा श्वास घ्यायचा. एस टी पुन्हा घुईं घुईं करत निघुन जायची. 
       स्टँड पासुन मामाचं घरं खुप जवळ नव्हतं शिवाय बरोेबर सामान म्हणून मामा घ्यायला यायचा. वाट पाहून पाहून मामा घरी निघून जायचा. मग कोणीतरी निरोप द्यायचा  " ए कांता तुया बयनी अाल्या" लगेच मामा गाडीला बैल जुंपुन बैलगाडी स्टँड वर घेऊन यायचा. मग त्यात ट्रंका, इतर सामान अन् बच्चे कंपनी म्हणजे आम्ही कोंबले जायचो. अन् मग चालली आमची वरात घराकडे. आई अन् मावशी पाई चालत यायच्या. गावातले रस्ते अन् आधीच खिळखिळी झालेली हाडं अन् त्यात ग्रामपंचायती जवळच्या नदीतील (उन्हाळ्यामुळे सुकलेली) गोल गोल दगडांमधून जातांना असं वाटायचं की आहे ती हाडं निसटून पडतील की काय. मग बैलगाडीतून उतरून पाई प्रवास सुरू व्हायचा.अंग धुळीनं माखलेलं असायचं. काल संध्याकाळी प्रवासाला निघालेलो आम्ही आज रात्र झाली तरी घरी पोहोचायचा पत्ता नसायचा. गावात लोकं अंगणात बाजा टाकून झोपायच्या तयारीत असायचे. गावात तेंव्हा लाईट नव्हते. लोक कंदील लाऊन गप्पा मारत बसलेले असायचे. चालता चालता कोणीतरी आपल्या तोंडाजवळ कंदील आणुन कोण आहे याचा तपास करायचे. कोणीतरी विचारायचं "कोन हाय?"  "डाक्टर सायबाच्या पोरी हायतं न शयरातून  आल्या." मग कोणीतरी "साजऱ्या हायत बाई नाती" असं म्हणत तोंडावरून हात फिरवायच्या. 
       चालत चालत रस्त्यात असंच सगळ्यांना भेटत घरी पोहोचायचं तोपर्यंत साडेनऊ दहा वाजलेले असायचे. घरी नाना (आजोबा), मोठी आई (अाजी), मामी सगळे वाट पहात असायचे. पण गावातल्या लोकांची आपुलकी अन् नाना, मोठीआई, मामा अन् मामींचं अगत्य यांनी सगळ्या प्रवासाचा शीण निघून जायचा.
    मामाकडे खुप मजा यायची. रोज पहाटे तिथे दिंडी यायची. शाळकरी मुले त्यांच्या शिक्षकां बरोबर मारूतीच्या देवळात आरती करायचे अन् मग श्लोक म्हणत गावातून प्रभातफेरी काढायचे. ती दिंडी आली कि आम्ही उठायचो मग अंगण झाडायचं, सडा टाकायचा, रांगोळी काढायची. हे सगळं घरी कधी करायला मिळायचं नाही. त्यामुळे मस्त वाटायचं हे सगळं करायला. 
        नानांकडे गेलं की रोजच आमरसाचं जेवण असायचं. आमची मोठीआई चुलीवर स्वयंपाक करायची. काय चव असायची त्या जेवणाला म्हणून सांगू. पण इतक्या सगळ्यांचा चुलीवर स्वयंपाक करायचा म्हणजे गंमत नाही हे आज कळतं. आमच्या येण्यामुळे मामीलाही खुप काम करावं लागायचं पण कधी चकार शब्दही काढला नाही मामीनी. 
      मामाची शेती होती त्यामुळे घरच्या भुईमुगाच्या शेंगा भरपूर असायच्या.घरी दोन तीन म्हशी होत्या त्यामुळे दुध, तूपाची काही कमी नसायची. आम्ही कधी कधी मामा बरोबर जायचो जनावरांच्या वाड्यात मामा दुध काढायला जायचा तेंव्हा. रोज रात्री आम्ही गच्चीवर झोपायला जायचो . मग तिथून  सप्तर्शी , शुक्र तारा बघत बघत झोपी जायचो. रात्री छान वाऱ्याची  झुळुक यायची. खुप छान होते ते दिवस. आजच्या A C ला ही त्याची सर येणार नाही.
      आमचे आजोबा म्हणजे नाना डॉक्टर होते त्यामुळे सकाळ संध्याकाळ दवाखान्यात पेशंट यायचे. गावात सगळे लोक ओळखीचे त्यामुळे दवाखान्यात मस्त गप्पा रंगायच्या. गावातल्या लोकांची खुप माया असायची. कोणी घरचं तांब्याभर दुध, कोणी घमेलंभर शेंगा, कोणी आंबे पाठवायचे आमच्यासाठी अन् चहाला बोलवणाऱ्यांची तर गिनतीच नसायची.
     बघता बघता सुट्टया संपत यायच्या अन् घरी जाण्याचे वेध लागायचे. मग मोठीआई घरच्या डाळी, शेंगा, तूप, पापड, लोणचं या सगळ्यांची बांधाबांध करायची आणि महिना दोनमहिने राहून तुप रोटी खाऊन छान गलेलठ्ठ झालेलो आम्ही घरी परतायचो.
       यासगळ्या आजोळपणात मामा-मामीचं खुप मोठं योगदान असायचं. ते आमच्यासाठी जे काही करायचे ते शब्दात सांगण अशक्यच. आज नाना , मोठीआई याजगात नाही पण ते मनात घर करून राहिलेले दिवस कधीच विसरता येणार नाही. अजुनही मी  देऊळगावच्या आठवणी रोज माझ्या लेकीला एेकवते अन् तीही आवडीने ऐकते.


सौ. मंजूषा गाखेडकर
पोस्ट आवडल्यास कृपया नावासकट शेअर करा