Saturday, 18 October 2025

Social Debt

        One afternoon Ashwin came to me to join my tuition class. He was in ninth standard. His hand was plastered. He showed interest in joining my classes, but no adult had accompanied him for the enquiry. Ashwin was sincere and honest, so I asked him to join from the very next day. One day his mother came to pick him up. We talked briefly about his progress in the class. She then took him outside and returned alone. She said, "Teacher, please pay attention to Ashwin's studies. He remains absent from school quite often.”  I assured her that I would do so. But then she continued worriedly, "No really teacher, Ashwin gets extremely exhausted sometimes because of which he has no option but to rest. He has Cancer, you know.” I was shaken by the news. I said, "Oh my God, I wasn’t aware!" She added, "I came to see you as a teacher. His studies are being overlooked because he misses his school a lot. He joined your class so he can cope up with other students. Please help him."

       I learnt that Ashwin was undergoing treatment but did not see much improvement. Finally, the doctor suggested a bone marrow transplant. But the operation would cost them an arm and a leg. Ashwin's parents were middle class. It was nearly impossible for them to scrape together such an amount. So Ashwin's mother started to get some help from other sources. Some Charity Institutions did help. The kids in my tuition gathered funds on their own too. We all went to support and lend our helping hand to Ashwin and his parents. I appreciated my students for their thoughts and eagerness to help. The date of his operation was scheduled. When we went to Ashwin, he was relaxing in his room but once he met us, he was delighted. The children spent all their time chatting with him. Later, we returned, wishing Ashwin well for the operation.

        Until the operation was concluded, Ashwin's mother was under tremendous pressure. Finally, the operation was successful. Both parents were overjoyed to hear that and so were we. But he had to be very careful. The operation had weakened his immunity, so there was a risk of infection. He was kept in a separate room where only doctors or a nurses were allowed to go. His Mother and Father used to sit outside and take care of Ashwin. He felt rather lonely in his room. Mobile phones, internet were not there in those days to entertain him. He spent all his time thinking alone.

       One day the patient in the adjoining room expired. Ashwin was terrified to hear the noise in the patient's room. The doctors and nurses rushing, the patients’ relatives screaming after the loss, everything scarred him. He experienced everything from his place. He collapsed in his mind. He asked a nurse if everyone had to go through this stage. 

       His health started deteriorating since that day. He did not respond to treatment. Even the doctors did not know why this happened so suddenly.

        The next day his condition worsened and he took his last breath. His parents collapsed. The body was to be brought from Mumbai. They had chosen Mumbai because it had best treatments and the city was their last hope. We didn't know what to say to the parents who had lost their only child, or how to console them. We felt very bad but there was nothing anyone could do. We used to remember him at least once a day in our class.

          Many days passed. I once met Ashwin's mother in the bus while going home. She seemed to have recovered from her loss. When I asked how she was, she said, "Teacher, I now work for cancer patients to help those who are sick and unable to afford the treatment. Others should not suffer like me and my son." She gave me a leaflet of 4-5 stapled pages, which contained information about the cancer hospital addresses, phone numbers of several doctors, where different tests can be done, what they are for, the estimated costs and institutions which would grant monetary help. (All of this would be readily available at a quick search on Google today, but in those days she wanted the information to be available to as many people as possible.) She was trying her best to help others while trying to forget the death of her only child. Big salute to such a mother and salute to her thoughts ...... I bowed to her out of Respect.



 Mrs. Manjusha Garkhedkar ©®

Saturday, 3 October 2020

भविष्य

 


  

  आज सकाळी आमच्या आळीत दोन माणसं आली होती. सोबत एक छानसा मोठी शिंग असलेला डौलदार आणि सजवलेला बैल होता. ती माणसं खड्या पहाडी आवाजात गाणी म्हणत होती आणि सोबत ढोल वाजवत होती. त्यामुळे सहाजिकच लोकांचं लक्ष त्यांच्याकडे जायचं आणि लोकं घरातून डोकावून बघत होते. जो त्यांच्याकडे बघेल त्याचं ते भविष्य सांगायला लागायचे. तेही खूप मोठ्याने सगळ्या आजुबाजुच्या बिल्डिंगमध्ये आवाज जाईल एवढ्या मोठ्या आवाजात.  ते खरे होते की खोटे त्यांचे त्यांनाच माहिती. जे त्यांना पैसे आणि तांदूळ वगैरे देत होते त्यांचही भविष्य सांगायचे. तुम्हाला १ च मुल आहे, तुम्ही खूप कष्ट केले पण तुमची कोणाला किंमत नाही. तुम्ही लोकांचं खूप करता पण तुम्हाला यश येत नाही वगैरे वगैरे सगळं सगळ्यांना लागू होईल असं सांगत होते.  मला पैसे देण्याची खूप इच्छा झाली. या करोनाच्या काळात लोकांची खूप सर्वांचीच खूप दुर्दशा झाली. आपणही कोणालातरी मदत केली पाहीजे असही क्षणभर वाटून गेलं.  मी शेजारून जाताना त्यातल्या एका माणसाने, "दीदी द्या की हो काहीतरी" असंही म्हटलं.  इच्छा असूनही मी त्याला काहीच दिले नाही कारण मी काही दिले असते तर त्याने लगेच भविष्य सांगायला सुरुवात केली केली असती.  आणि या बाबतीतला माझा अनुभव फारच वाईट होता. एकदा असच 15 ऑगस्ट ला मी झेंडा वंदन करून घरी आले तर एक वासुदेव आमच्या कॉलनीत पहाटेची गाणी म्हणत चिपळ्या वाजविताना दिसला. त्याचा आवाज खूप गोड होता. नेहमी आमच्या कॉलनीत यायचा पण त्याच्या आवाजाला कधी दादही देता आली नव्हती अन् त्याला काही देताहीआलं नव्हतं. म्हणून म्हटलं आज त्याला काही तरी द्यावं. म्हणून मी गाडी पार्किंग मध्ये लावली आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला पैसे दिले. त्यानेही असंच भविष्य सांगायला सुरुवात केली की तुम्ही खूप कष्टाळू आहात, तुम्ही सगळ्यांचं करता पण तुम्हाला यश येत नाही वगैरे वगैरे....मीही ही हुरळून गेले. मला वाटलं हा फारच परफेक्ट भविष्य सांगतोय. असं करत करत त्याने मला सांगितलं की तुमच्या मिस्टरांचा अपघात होण्याची शक्यता आहे. मिस्टर हायवे वरून रोज ५५-६० किमी टू व्हीलर वर जा- ये करायचे. मग मी जरा घाबरले कारण आधीचं जे काही त्याने सांगितलं ते जर खरं असेल तर हेही खरं होईल अशी मला भीती वाटली. मग तो म्हणाला, "काही दानधर्म केला तर कदाचित तुमच्यावरच संकट टळेल." मी म्हटलं ,"ठीक आहे करेन मी दानधर्म." मनातल्या मनात काहीतरी दानधर्म करावा असंही मी ठरवून टाकलं. पण तो म्हणाला, "तसं नाही आताच काहीतरी दानधर्म करा नाही तर तुमच्यावर अरिष्ट येईल." मग त्याची चाल हळूहळू माझ्या लक्षात यायला लागली. मग लक्षात आलं की याला माझ्याकडून काहीतरी अपेक्षित आहे. म्हणून हा मला घाबरवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याने सरळ सरळ मला काहीतरी द्या म्हटलं असतं तर मी दिलहि असतं पण त्याच्या चलाखी चा मला फार राग आला. लोकांच्या भावनांशी खेळून पैसे मिळवण कितपत योग्य होतं?? आणि त्या दिवसापासून ठरवून टाकलं की द्यायचं असेल तर एखाद्या गरिबाला, गरजूला किंवा भिकाऱ्याला द्यावे. असल्या नाटकी भविष्य वाल्याला नक्कीच नाही.

सौ. मंजूषा गारखेडकर ©®

Wednesday, 23 September 2020

बंडी उलार

 


# बंडी उलार

       परवाच्या दिवशी बापूराव ‌ आलते. ते माह्या बुढ्‌याले म्हने का बाप्पा पोराचं लगन करतु का न्हाय? माहा बुढा काई नावंच नाई काढे. बापुराव म्हने का पोरगं कमावते तं काहून न्हाई करत लगन? पायजा बापा नाईतर थ्योच ईल ठरून. मंग बसाल बय बय करत. बुढा आयकत हुता. मंग इचार करून म्हने का करून टाकू काय कराचं. म्या सारं आयकत व्हतो. माह्या तं मनात उकळ्या फुटत व्हत्या. चाला म्हनलं....बुढा लग्नाले तयार तं झाला....बापुरावनं बुढ्याले यका पोरीचा फटू दाखवला.  बुढ्यानं फटू पायला अन् म्हने का बापुराव, "पोरगी कधी पाहाची, ते ठरूनच टाका.” मले तं वाटे का आत्ताच जाऊन पोरगी पाहून याव. पन माहा बुढा लयच खऊट. मले तं त्यानं फटू बी नाई दाखवला.


       बापुरावनं पोरगी पाहाचा कारेक्रम ठरून टाकला . येनाऱ्या इतवारी ठरला. मले वाटे बापा इतवार येते का नाई ? म्या म्हनतो इतवारची वाटच कायले पाहा लागते ? आजच जाऊन पोरगी  पाहाची अन् टाकाचं ठरून . मंग उशीर च उशीर होत जाते. पन ह्या बुढाले सांगन कोन?? त्याले टाईम नसन तं म्याच आलो असतो पाहून. इतवार आला कसाबसा. मंग म्या.... माई माय.... माहा बुढा.... सरसोती मावशी....बापुराव.... माहये दोन भाऊ आन् माही बईन अन् जवाई आन् दोनचार लहान पोरं  गेलो पोरगी पहाले. म्या तं मस्त पांढऱ्या रंगाची प्यांट अन् गुलाबी शर्ट घातला. अन् आरसा घिऊन न्हानीघरात गेलो. अन् तिथं तोंडाले किरीम गिरीम लावली अन् पावडरई लावलं. कालच्यालाच माह्या दोस्तानं फेशियल का काय ते पन करून दिलतं. आज म्या तं मस्त घोटून दाढी केली. म्हनलं पोरीनं म्हनलं पायजे का पोरगं त लईच मस्त हाय.  

       मंग आमी सारेजन पोरीच्या घरी गेलो. त्यांच्या घरी बिछाईत गिछाईत करून ठेवली होती. सारेजन बसले खाली बसले बिछायतीवर.  बापा अन् मलेच बसायले जागा न्होती. मंग म्या उभाच रायलो. तं पोरीच्या बाप म्हनते का बसानं तुमीबी त्यानं मले खुर्चीच आनुन देल्ली. सारे खाली बसले न् नवरदेव खुर्चीवर. माह्या बाजूले बी यक खुर्ची ठिवली तं मले वाटे का पाेरीनं इथच बसाव. मले तं लग्नात बसल्यावानी वाटे. 

       सारेजन बोलत व्हते न् म्या नुसताच बसून व्हतो. तं आतून एक पोरगं आलं. इऊन माह्या बाजूच्याच खुर्चीत बसलं. म्या म्हनलं ह्याले हेच जागा भेटली का? पन मी म्हंतो याचं हितं कामच काय हाय? बसलं तं बसलं. माह्याशीच बोले. तुमी काय शिकले? कुठं नोकरी करता? मी म्हनतो याले कराचंच काय? पोरगी बी येत न्हवती. त्या पोराचे केस तं पोरी सारखेच होते बापा. बापकट का काय म्हनते तसे. अन कानातई डूल व्हते. मले तं ते पोरगं हिलन वानी वाटे.  शिनेमात नसते काय हिरो हिराईनच्या मधी मधी करते तसं. हिलन म्हनाव त नाजुकई वाटे. त्या पोरानं मले इचारलं , "काऊनजी तुमाले सैपाक गिपाक येते का नाई? बायकु बेमार पल्ली तं?” मले त वाटे का उठून त्याच्या कानशिलात द्याव पन काय करता , लगन करायचं व्हतं नं. म्या म्हनलं, “ नाई बा आपुन सैपाक गिपाक नसतो करत. हाटेलात जाऊन जिवून इऊ.” 

थे पोरगं लयच चबर चबर करे आन् मले प्रश्न ईचारे.....मले बोलाचं नव्हतो तरी येऊन जाऊन माह्याशिच बोले.असं वाटे का त्याले मनाव का जाय ना तुले काई कामं धंदे नही काय??? पन.....

      थोडा येळ झाला तसा  बुढा म्हने का, "आना पोरीले भाईर".  तं पोरीचा बाप म्हन्ते का, "ते काय आमची पोरगी पोराच्या बाजूलांच तं बशेल हाय. आमची पोरगी चांगली शिकेल हाय. बी.ए झालीना थे.” आमी तं हपचकच झालो बापा. थ्यो पोरगा वाटला थेच पोरगी होती. म्याच तिच्याकडे पाहून लाजत जाओ मंग. मंग म्या तिले टक लाऊनच पहात जाओ. माह्या बुढ्याले काई थे पोरगी पटलीच नवती. तिची ती फ्याशन का काय बुढ्याले नवतीच आवडली. बुढा तिले इचारे "काहून तुमच्या कालेजात हेच शिकोते काय? " तं ते पोरगी म्हनते , “त्याले फ्याशन म्हनते. ते तुमाले नाई समजनार. त्याले कालेजात जा लागते.” मंग बुढ्याचं डोसकच फीरलं. पन मले तं पोरगी लईच भायली. मले वाटे का पोरीले घिऊन फिराले जाव. माही बईन इचारत व्हती पोरीले का, “ तुले काय काय आवडते?” तं पोरगी म्हने, “ मले तं शिनेमा पहाले, फिराले, अन् फ्याशन करालेच आवडते बाप्पा.” तं माहा बुढा खवळलाच, म्हने का पोरगी काई सरळ दिसत नाई. माहा जीव तं खालीवर व्हये. मले तं पोरगी लयच भायली व्हती ना. म्या मनातंच म्हनलं अशी पायजे बां पोरगी हिराेईनी वानी. माया सारख्या हिरोले तं हेच शोबते.


       बोलता बोलता आमच्या साठी पोयाच्या बशा भरून आल्या. पोरं लई दांगडो करत व्हते. त्यानले लयीच मजा येत व्हती.... आमच्या मामाचं लगीन हाय म्हनून लयीच हरखली व्हती. ईकून तिकून पयत व्हते. तितक्यात यक बाई पोयाच्या बशा घिऊन आली. तं त्यायच्या कडच्या पोराचा लागला धक्का आन सगया पोयाचा सत्यानाश.....सारा जनु पोयाचा सडाचं पल्ला. माया बुढ्याले तं  लईच संताप आला.... पन तो गप गुमान बसला.... पन थ्या पोरीच्या बापानं थ्या पोराले दिली थोपकाडीत लाऊन. मंग ते पोरगं लागलं बोंबलाले मने साऱ्या लोकाई समोर माया वाला अपमान केला तुमी. अन् लागला लाथा झाडाले. त्यानं तं च्या च्या कपाले देल्ली लात झाडून.त कप डायरेक बुढ्याच्या आंगाव आला. आता बुढ्याचा संताप इचरूच नका. बुढ्याचं तोंड सगर भाजलं.... मंग सारे बुढ्याकडे वयले. कोनी म्हने ठंड पानी मारा तं पोरीच्या भावानं बुढ्याच्या तोंडाव ठंड पानीच फेकलं. बुढा लईच खवयला.  बुढा संतापानं लालेलाल झाला. मने ईथ थांबाचच नाय कोनी चाला आता...बुढ्याचे सारे कपडे वल्ले झालते. मंग त्यो खवळनार नाय तं काय?? पन तरी मले वाटे का इथच थांबाव. मंग थ्या पोरीच्या बापान बुढ्याले त्याच्यावाले कपडे देल्ले बदलाले. तं बुढा म्हने की मी नसतो घालत लोकाईचे कपडे. मंग त्यायनं यक नविन धोतराचं पान देल्ल बुढ्याले नेसाले अन् पोरीच्या भावाचा सदरा देल्ला. त्यो ढगाळ घालून बुढा तं निव्वळ बुजगावन दिशे. मले तं त्याले पायलं तं हासूच ये. संतापलेल्या बुढ्याले पोरीच्या बापानं लई समजावलं मंग त्यो जरा शांत झाला. मंग कोनतरी गायीचं तुप फासलं बुढ्याच्या तोंडाले.पोरांचा दांगडो तं काई कमीच व्हत नवता. मंग बुढा लयच भडकला. मंग आलो आमी निघुनशान घरी.

         घरी आलो तं बुढा बापुराव वरंच गरम झाला. काई पोरी दाखवता तुमी तं. पयले सांगतलं असतं तं आलोच नसतो पोरगी पहाले. कोनालेच पोरगी पसंत पडली नाय. मंग माहं तोंडच उतरलं. तशी बुढी म्हने पोराले तं इचारा काय म्हंते तं. बुढा म्हने पोराला कायले इचारा लागते. आपुन ठरू ते पोरगा करन. मंग म्याच म्हनलं, " म्या लगन करन तं थ्याच पोरीशी नाईतर म्या नाई करनार.” म्या असं म्हनलं तं बुढा आंगावर धाऊनच आला. मंग म्या गेलो निघुन घरातून. जाऊन बसलो डोंगरावरच्या रानात. मले तं सारीकडे हिरवं हिरवंच दिशे अन् शिनेमातल्या वानी फुलं दिशे. आनं ते पोरगी गानं म्हने “परदेशी परदेशी जाना नही”. अन् म्या गेलो धावतच पोरीच्या मांगं मांगं. जवा समोरच्या बाभळीच्या झाडावर आपटलो न् नाक ठेचलं तवा समजलं का हे काई शिनेमातलं बगीचा न्हाई. राती पावतो तिथंच बसलो. पोटात लय कावळे कोकलत व्हते पन समोर पोरगी दिसली का मले थंड थंडंच वाटे. रातचाला गेलो घरी. सारे कामातच व्हते. म्या उशीत तोंड खुपसून झोपूनच रायलो. मग माय आली चल बाबु भाकरतुकडा खाऊन घे म्हनून सांगायले. पोरगं सकायपासून उपाशी हाय. म्या म्हनलं मले न्हाई जेवाचं. पयले थ्या पोरीशी लगन ठरून दे मंगंच म्या जेवन. म्या नाई जवलो तं बुढी बी उपाशीच झोपली. म्या तं राती मस्त सपान पायलं. बुढा - बुढी राती जागेच व्हते. कायतर खुसूरपुसूर करत व्हते. रातो गुपचूप जाऊन भाकर खाव म्हनलं तं , हे जागेच.

      म्या सकाय वकाय उठलो न् मायले म्हनलं जातो म्या घर सोडून. मले नाई रहाचं ह्या घरात. तं बुढा म्हनते, “ काऊन, जास्तं माज आलां का? माज आला अशीन तं जाय, राहाशीन तं तथ्या पोरीशी लगन लावून देतो.” राती बुढीनं बुढ्याले समजावलं का पोरगी कशीई असली तं इथं आली का सुधारून घिऊ. बुढा कसाबसा तयार झाला. मले तं बुढा तयार झाला उडावंच वाटे. वाटे आत्ताच लगन करून यावं.

       बुढ्याने मंग बापुरावले सांगावा धाडला. बापुराव आल्यावर त्याईले सांगतलं का पोरगा तं म्हनते का थेच पोरगी पायजे. तुमी असं करा पोरीच्या घरी जाऊन सांगा आमाले पोरगी पसंत हाय. मंग टीळा ठरून टाकू. बापुराव तं पाहातच रायले. थे गेले पोरीकडं. तिथं बोलून गिलून घराकडे येताना दिसले. म्या म्हनलं टीळ्याची तारीखई ठरून आले असन. म्हनून म्या कान दिऊन आयकत व्हतो. तं बापुराव म्हने का, “ पोरीले पोरगं पसंत नाई. थे म्हनते का त्या पोराले काई समजतच नाई.”

मले तं थोबाडीत मारल्यावानीच झालं. मंग माहा बुढा मले म्हनते का, " करनं बाबु लगन थ्याच पोरीशी लगन, आता काहून तोंड वेंगाडून बसला?”

झाली ना माही बंडी उलार!



सौ मंजूषा गारखेडकर ©®





Sunday, 30 August 2020

समाजऋण

  समाजऋण 


एक दिवस दुपारी अश्विन माझ्याकडे क्लास लावायला आला. तो नववीला होता. त्याच्या हाताला प्लास्टर होत. त्याने क्लासला येण्याची इच्छा दर्शवली पण त्याच्यासोबत कोणीही नव्हते. अश्विन चांगला सालस होता त्यामुळे मी त्याला दुसऱ्या दिवशीपासून क्लासला येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पासून तो क्लासला येऊ लागला. एक दिवस त्याला घ्यायला त्याची आई आली. त्याच्यासमोर क्लास बद्दल जुजबी बोलणं झालं. ती त्याला घेऊन बाहेर गेली व त्याला बाहेर ठेऊन ती परत आली. "टिचर  अश्विनच्या अभ्यासाकडे लक्ष द्या बरका. त्याच्या शाळेतही खूप दाड्या होतात." त्याची आई म्हणाली. हो म्हणून मी त्यांना आश्वासन दिले. मग त्या म्हणाल्या, "तसं नाही टीचर अश्विन  कधी कधी खुप थकतो. यामुळे  त्याला  काहीच करायला जमत नाही . अभ्यासही नाही  मग तो अभ्यासात मागे पडतो. कॅन्सर आहे ना त्याला." हे ऐकून माझ्या पायाखालची वाळूच सरकली. मी म्हणाले,"अरे बाप रे मला नव्हतं माहिती." "टीचर म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आले त्याची शाळा बुडल्यामुळे त्याचा अभ्यास होत नाही, म्हणून त्याला क्लास लावला आहे. तुम्ही प्लीज त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. त्याची ट्रीटमेंट सुरू आहे."

           अश्विनची ट्रीटमेंट सुरू होती पण फारसा फायदा झाल्याचं काही दिसत नव्हतं. शेवटी डॉक्टरांनी बोनमॅरो ट्रान्सप्लांट करायला सांगीतलं. खर्च आवाक्या बाहेरचा होता. अश्विन चे आई-वडील मध्यमवर्गीय होते. एवढा खर्च करणे त्यांना कठीण होते. त्यामुळे अश्विन च्या आईने इतर ठिकाणाहून काही मदत मिळते का पाहायला सुरुवात केली. काही संस्थांनी मदत केली. माझ्या ट्यूशन मधल्या मुलांनी स्वत:हून मदत गोळा केली. आम्ही सर्वांनी सगळ्यांची मदत घेऊन जमवलेले पैसे अश्विनला द्यायला गेलो. त्याच्या ऑपरेशनची तारीख ठरली होती ट्युशनच्या मुलांनी खारीचा वाटा उचलला होता. खुप कौतूक वाटले मुलांचे. अश्विन कडे गेलो तर तो बाहेरच्या खोलीत आराम करत होता. आम्हाला पाहून त्याला खूप आनंद झाला. मुलं एकमेकांशी भरभरून बोललीे. अश्विनला ऑपरेशनसाठी शुभेच्छा देऊन आम्ही परत आलो. 

        ऑपरेशन होईपर्यंत अश्विनच्या आईचा जीव टांगणीला लागला होता. ऑपरेशन सक्सेसफुल झालं म्हटल्यावर आई बाबा दोघही खुप खूष झाले. आम्हाला कळल्यावर आम्हालाही आनंद झाला. पण त्याची खूप काळजी घ्यावी लागणार होती. कारण ऑपरेशनच्या वेळी त्याची इम्यूनिटी खूप कमी केल्याने इन्फेक्शनचा धोका होता. म्हणून त्याला विलगीकरण कक्षात ठेवले होते जिथे फक्त डॉक्टर किंवा नर्सच जाऊ शकत होते. आई बाबा बाहेर बसून अश्विनची काळजी करत असायचे. अश्विन रुम मध्ये एकटाच असायचा. बोलायला कोणी नव्हतं. तेंव्हा मोबाईलही नव्हते. एकटाच विचार करत पडलेला  असायचा.

         एक दिवस त्याच्या शेजारच्या विलगीकरण कक्षातला पेशंट गेला. त्यावेळेस त्या पेशंटच्या रूममधले आवाज, डॉक्टर , नर्सेस यांची पळापळ, पेशंटचं तडफडणं आणि मग नातेवाईकांची रडारड हे ऐकून तो फारच घाबरला. त्याच्या जागेवरून सगळं अनुभवलं त्यानं. मनातून तो पार कोसळला. तो एकदाच नर्सला म्हणाला की सगळ्यांचं असच होतं का?? त्याची तब्येत त्या दिवसापासून ढासळायला लागली. तो उपचारांना प्रतिसाद देईनासा झाला. डॉक्टरांनाही कळेना की असं का झालं अचानक ते. 

       दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती खुपच खालावली आणि त्याने शेवटचा श्वास घेतला. त्याचे आईवडील पार कोसळून गेले. मृतदेह मुंबईहून घरी आणला. मोठ्या आशेन लेकराला नेलं होतं मुंबईला. आम्ही त्याच्या आईला भेटायला गेलो तर काय बोलावं ते ही कळत नव्हतं. बिचारी माऊली तिचा एकुलता एक लेक गमाऊन बसली होती. खूप वाईट वाटलं. पण आपल्या हातात काहीच नसतं. आमच्या क्लास मध्ये त्याची रोज एकदातरी आठवण निघायची. 

           बरेच दिवस निघून गेले. मी एकदा बस ने येतांना बस मध्ये अश्विनची आई भेटली. बरीच सावरली होती. कशा आहात विचारल्यावर म्हणाली, "टिचर मी आता अशा आजारी अन् ऐपत नसलेल्यांना आर्थीक मदत मिळविण्यासाठी अन् कँन्सर पिडीतांसाठी काम करते. इतरांच्या वाट्याला तरी माझ्यासारखं दु:ख नको." तीने मला स्टेपल केलेली 4/5 पानं मला दिली त्यावर कँन्सर हॉस्पीटलची माहीती, पत्ते, अनेक डाक्टरांचे नंबर, वेगवेगळ्या टेस्ट कुठे, कशासाठी केल्या जातात व त्याचा अंदाजे खर्च इ सर्व माहीती होती. (आज हे सगळं गुगलला सहज उपलब्ध असेल पण तिनं जमवलेली माहीती इतर कोणालातरी उपयोगी पडावी हीच तिची इच्छा होती) स्वत:च्या एकुलत्या एका मुलाचं दु:ख बाजूला ठेऊन दुसऱ्याचं दु:ख डोईवर घ्यायला निघाली. धन्य ती माऊली..... अन् धन्य तिचे विचार...... आपोआपच मी तिच्यासमोर नतमस्तक झाले.



© सौ. मंजूषा गारखेडकर

Sunday, 2 August 2020

तानी

# तानी


तानी आज खुप गडबडीत होती. तिला आज इकडे तिकडे पहायलाही वेळ नव्हता. अमावस्या जवळ आली होती. अजून काहीच काम झालं नव्हतं. आज रविवार असल्याने तानी कामाला लागली होती. "ताने मी चालली व, जेवून झाकपाक करून ठिवजो, मी येता  दुपारी" तानीची माय ओरडून निघून गेली. कानीचं मात्र तिच्याकडे लक्षच नव्हतं. तिने जुन्या प्लॅस्टीकच्या डब्यातून आणलेली माती चाळणीने दोन वेळी चांगली चाळून घेतली. नंतर तिने ती छान त्याच डब्यात भिजत घातली. सगळीकडे फीरून गोळा केलेल्या कागदाचे तुकडे फाडून चिंध्या केल्या त्याही एका डब्यात भिजवून ठेवल्या. 
            आज तिला दुसरं काहीच सुचत नव्हतं. कालच बाईंनी सांगितलं की या वर्षी तान्हा  पोळा आपण आपल्या शाळेत साजरा करणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी आपली आपली बैलजोडी छान सजवून आणायची. ज्याची बैलजोडी छान सजलेली असेल त्याला आपण बक्षीस देणार आहोत. 
          तानीला माहीती होतं की आपल्याला तर लाकडी बैल घेणं परवडणार नाही. म्हणून तिने स्वत:च मातीचे बैल करायचं ठरवलं. तानी तिच्या आईची एकटीच मुलगी होती. तिचे वडिल लहानपणीच दारूच्या व्यसनामुळे देवाघरी गेले होते. तानीची माय चार घरी धुणी भांडी करून आपला उदरनिर्वाह चालवित असे. तानी फार समजूतदार होती. अभ्यासातही पुढे असायची. नविन गोष्टी शिकायची तिला भारी आवडं. त्यामुळेच तिला मायच्या मालकीणबाईंनी रंगाची पेटी भेट दिली होती. 
       तानीला माती कधी भिजते असं झालं होतं. दुसऱ्या दिवशी तिने ओली माती पातळ कापडातून गाळून घेतली अन् त्यात भिजलेले कागद घट्ट पिळून चागले एकजीव करून ठेवले. एक दोन  दिवसानंतर मातीतलं पाणी आटून मातीचा छान गोळा झाल्यावर तिने बैल करायला घेतले. त्यांना छान आकार दिला. त्यांना टोकदार शिंग लावले, पाठीवर छान झूल टाकली, त्यावर मस्तपैकी नक्शी काढली. दोन्ही बैल एकसारखे झाले होते. त्यावर ब्रशने पाणी लावून सारखेपणा आणला. कशी छान झाली होती बैलजोडी. तानी मनोमन खूष झाली. तिला झोपेतही बैलजोडीच दिसत होती.
         बैल वाळल्यावर तिने मालकीणबाईंनी दिलेल्या रंगांनी मस्तपैकी रंगवले. शिंगांना तिचा आवडता लाल रंग दिला. झुल तर दोन तिन रंगांनी नक्षी काढून रंगवली.  डोळे बारीक ब्रशने छान कोरीव केले. आता बैलजोडी अजूनच छान दिसायला लागली. 
          आज पोळा होता सगळ्या शेतकऱ्यांनी बैलांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्याचा घास त्यांना भरवला तसंच तानीनेही घरात तिच्या बैलांची पूजा केली. उद्या तान्हा पोळा होता त्यामुळे ती खूष होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तिने फुलं गोळा केली. फुलांच्या रंगीबेरंगी माळांनी बैल सजविले अन् नविन ठेवणीतला फ्रॉक घालून तयार झाली. मनोमन ती खूष होती. शाळेच्या आवारात पोहोचली तेंव्हा तीने पाहीले, कोणाचे बैल छान चाकं लावलेले , कोणाचे विद्युत दिव्यांनी सजवलेले, कोणाचे नानाविध रंगांनी रंगवलेले तर कोणीतरी चक्क बैलाच्या वरच्या मजल्यावर महादेवाचं मंदीर बनवून महादेवाच्या डोक्यावरून गंगा वहात असलेेले बैल अाणले होते. तिचे बैल खुप लहान, चाकं नसलेेले आणि अगदीच साधे होते. त्यामुळे तिचं मन जरा खट्टू झालं. 
          शाळेच्या पटांगणावर मोठ्ठ तोरण बांधलं होतं. तिथेच सुंदर रांगोळी काढली होती. सगळी मुलं आपापले बैल घेऊन तोरणाच्या मागे उभी होती. बाईंनी सगळ्यांच्या बैलांची पुजा केली. परीक्षकांनी परीक्षण करून नंबर काढले. मग सगळ्यांना डाळ काकडीचा प्रसाद देण्यात आला. मग परिक्षकांनी निकाल जाहीर केला. आश्चर्य म्हणजे तानीने स्वत: बैल तयार केले असल्याने तिचा प्रथम क्रमांक आला होता. ती खूपच खुष झाली. मायला कधी सांगते असं तिला झालं होतं. परिक्षकांनी नारळ फोडले तसे तोरण तोडून सगळे स्पर्धक आपापले चाकाचे बैल ओढत मारूतीच्या मंदीराकडे धावत निघाले. तानीनेही स्वत:चे बैल कडेवर घेतले अन् तीही धावत सुटली. सगळेजण मारुतीच्या मंदीरात पोहोचले. तिथे पहिला पोहोचलेल्या मुलांचा नंबर देण्यात आला. मारूतीचं दर्शन घेऊन मुले घरोघरी बैलांच्या पुजेला निघुन गेली. तानी मात्र मायला सांगायला मालकीणबाईंच्या घरी गेली. माय मागच्या अंगणात भांडी घासत होती. तानीने तिला शाळेत काय काय घडलं ते सगळा वृत्तांत कथन केलल. पहिला क्रमांक मिळाल्याही सांगितलं. मायलाही खूप आनंद झाला. तितक्यात मालकीणबाई तिथे आल्या. त्यांनी तानीचे बैल पाहीले. त्यांनाही ते खुप आवडले.त्या म्हणाल्या, "अग तानी बैल आणलेस सागायचं नाही का?? आण आपण तुझ्या बैलांची पूजा करू." त्यांनी बैलांची साग्रसंगीत पूजा केली. तानीचे अन् बैलांचे फोटो काढले. मग तानीला खाऊ खायला दिला. "वत्सला तू पण ये ग", असं म्हणून काकू आत जाऊन आवरून आल्या. तानी आणि तीची माय निघणार तितक्यात सोसायटीतल्या सगळ्याजणी नटून थटून तिथे पोहोचल्या. मग सगळ्यांनी तानीच्या बैलाची पूजा केली आणि तानी व  तिच्या बैला सोबत फोटो काढले. वत्सलाबाईला बोलवायला त्या विसरल्या नाही. या सगळ्या अनपेक्षित कौतुकाने तानी भारावून गेली. तिला तर आज सेलेब्रिटी झाल्यासारखं वाटत होतं. 

[ विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्हा पोळा साजरा केला जातो.]


सौ. मंजूषा गारखेडकर
पोस्ट आवडल्यास कृपया नावासकट शेअर करा हि विनंती

Friday, 24 July 2020

काळी

#काळी 


            मध्यंतरी मी रस्त्याने जात होते. जरा घाईतच होते. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे असेल पण रस्त्यावर बऱ्यापैकी गर्दी होती.  पुढे गेल्यावर ट्रॅफीक जामच झाला. आता वाट पहाण्याशिवाय पर्याय नव्हता. सहजच आजुबाजुला पाहीलं. बाजूला झोपडपट्टी होती तिथे मुलं खेळत होती. जरा वेळाने त्यांची भांडणं सुरू झाली. एक मुलगा त्याच्या लहान बहीणीला "ए काळे ए काळे" म्हणून चिडवू लागला. ती चिडते हे बघुन त्याला आणखी जोर चढला. शेवटी ती रडायला लागली अन् जवळचं बायकांचा घोळका बसला होता तिथे जाऊन तिने तिच्या आईला सांगीतलं. आई लक्ष देत नाही हे बघनु मुलगी अजुनच जोर जोरात रडायला लागली. किंचाळू लागली तसा आईने तिला धपाटा घातला अन् म्हणाली, "मंग काय झालं कायी म्हनलं त..तु कायीच हाय नं.. तुया आंगाले का भोकं पडले का माय?? जाय तुया भावाले भाकर तुकडा दे." त्या आईने मुलाला रागवायचं सोडुन तिलाच धपाटे घातले. म्हणजे काय? ती मुलगी काळी आहे ही काय तिची चुक आहे का?? काय गुन्हा आहे त्यात तिचा. मुलगा तर मुलगा आई पण तिला काळी म्हणून हिणवत बघुन खूप वाईट वाटलं. असं म्हणतात आईला सगळी मुलं सारखीच असतात. पण ही आई फक्त मुलाची बाजूच घेत नव्हती तर मुलीवर अन्याय देखिल करत होती. तिचा स्वाभीमानही दुखावत होती. काय चूक होती त्या लेकराची?? ती न्यायच मागायला गेली होती ना तिच्या आईकडे?? असे प्रसंग जर वारंवार घडले तर त्या मुलीला नक्कीच नैराश्य येईल.
          हा प्रसंग जरी झोपडपट्टी मध्ये घडला तरी अापणही असे प्रसंग वेळोवेळी अनुभवत असतो. काही लोकं मुद्दाम दुसऱ्यांना खिजवण्या साठी असं काहीतरी बोलतात. "तु एवढा डार्क ड्रेस नको घेऊ तुला नाही चांगला दिसणार" असं चक्क तोंडावर बोलतात. समोरच्याला काय वाटेल, त्याच्या मनाला काय वेदना होतील ह्याचा कधीच  विचार करायचा नाही. कसा करणार?? त्यासाठी संवेदनशिलता असावी लागते. आणि ते अशा थाटात म्हणतात की जसे काही ते स्वत: अप्सरे पेक्षाही सुंदर आणि मोनालीसापेक्षाही नितळ गोरी त्वचा लाभलेलेच आहेत जणू. आणि आश्चर्य म्हणजे यात माणसंही मागे नसतात. समोरच्याचं मानसिक खच्चीकरण करणे हाच उद्देश असतो बहुतेकवेळा. समोरच्याला त्याच्या दिसण्यावरून, उंचीवरून, रंगावरून बोलून काय साध्य करतात लोक तेच काही कळत नाही. 
         एकदा एका लग्नात कोणीतरी एका मुलीला असचं बोलण्याचा प्रयत्न केला तर दुसरी बहीण तिच्यामागे ठामपणे उभी राहीली आणि तिने सगळ्यांना खडसावून सागितलं की, "खबरदार माझ्या बहीणीला असं काही बोलाल तर.. तिची ताई तिच्या मागे खंबीरपणे उभी आहे. तिच्यातले गुण तुम्हाला दिसले नाही का?? की चांगलं बघण्याची सवय नाही डोळ्यांना तुमच्या??" अभिमान वाटला त्या बहीणीचा. समाजात कितीही सुधारणा झाली तरी अश्या वृत्तीचे लोक सगळीकडे दिसतात. मुद्दाम चारचौघात नको असलेले विषय काढून समोरच्याला मेल्याहुन मेल्यासारखं करुन सोडणे हा त्यांचा आवडता छंद असतो. समोरच्याची ऐपत नसेल तर मुद्दाम त्याला खार्चीक सूचना देणे. तू अमुक एक वस्तू  का घेत नाही हे मुद्दाम चारचौघात विचारणे. नाहीतर आमचं इन्कम किती जास्त आहे हे लोकांना कळण्यासाठी सर्वांसमोर त्याचं वर्णन करून सांगणे. कोणाच्या घरात वाद असतील तर मुद्दाम त्याविषयीच प्रश्न विचारणे. कुणाला मुल होत नसेल तर मुद्दाम हळदीकुंकाला त्यावर प्रश्न विचारणे. कुणाचं लग्न ठरत नसेल तर दहावेळा विचारून भंडावून सोडणे ,अगदी समोरच्याला जगणं नकोसं करणे आणि न पटणारी वाट्टेल ती स्थळं सांगणे. ज्याच्याकडे जे नाही त्यावरून त्याला बोलणे हा काही लोकांचा छंदच असतो पण त्याचा समोरच्यावर किती खोल परिणाम होतो याचा ते कधीच विचार करत नाही. (त्याच बरोबर त्यांच्या मनातून तुम्ही उतरता हे ही तुमच्या लक्षात येत नाही.) अशा अनेक कारणांनी लोकांना फ्रस्ट्रेशन येऊ शकतं हे लोकांना कळायला हवं.
        लोकांना इतरांना खिजवून काय मिळतं देवच जाणे पण घरच्याच लोकांनी जर अशी   वागणूक दिली तर मुलांनी दाद तरी कुठे मागायची ??


Saturday, 18 July 2020

मुले

# मुले 


       लहान मुलांशी बोलायला मला खुप आवडतं. त्यांच्याशी बोललं की सगळे टेंशन्स विसरायला होतात. किती गोड असतात मुलं . अन् त्यात आजची पिढी तर खुपच स्मार्ट. फार हजरजबाबी आणि चाणाक्ष. त्यांचं निरीक्षणही खुप असतं. बरेचदा त्यांच्या बोलण्यातून विनोद निर्मिती होते. पण या सगळ्यात आई  वडीलांची कधी कधी फजीतीही होते.
        एकदा आमच्या शाळेतली शिक्षिका तिच्या मुलाला शाळेत घेऊन आली. मुलाचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर आत स्टाफ रूम मध्ये आला जिथे प्राचार्या मिनाझ मॅम पण होत्या. त्यानी त्यांचं नाव एेकलं अन् त्याच्याकडे हातवारे करत म्हणाला,"हिच का ती मिनाझ??" त्याच्या आईच्या पायाखालची वाळूच सरकलीच असेल. अजून काही बोलायच्या आत ती त्याला बाहेर घेऊन गेली.
       एकदा मी गिरणीत उभी असतांना दोन लहान मुले हरभरा डाळ घेऊन आली. साधारण एक किलो असेल. पिशवित डबा ठेऊन दोन्हीकडून दोघांनी पिशवी धरून आणली होती. ते गिरणीवाल्याला म्हणाले, "लगेच दळून द्या आमच्याकडे पाहूणे आले आहेत." तो म्हणाला, "लगेच मिळणार नाही वेळ लागेल" तर ही छोटी मुलं त्याला दमदाटी करू लागली. "ओ मुकाट्याने दळून द्या. पाहूणे आले कळत नाही का तुम्हाला??" बघा ह्यांची कमाल.
        एकदा आम्ही आमच्या नातेवाईकांकडे गेलाे होतो. माझी मुलगी लहान होती. आम्ही सगळे जेवायला बसलो. अचानक ती माझ्या काकांना म्हणाली, "अो आजोबा किती  जेवताय तुम्ही??" आम्ही सगळे बघतच राहीलो. काहीतरी बोलायचं म्हणून काका म्हणाले, "अगं मी सावकाश जेवतोय म्हणून मला वेळ लागतोय." तर म्हणाली, "तुम्ही काय रवंथ करताय का? आवरा की लवकर" आता या मुलांना काय म्हणावं..
         आमच्या बिल्डींगमधली रेवाही तसलीच. एकदा सकाळी शाळेत जातांना बसजवळ कुत्र्याचं पिल्लू तिच्या मागे गेलं. आधीच उशीर झालेला. बसवाले काका घाई करत होते अन् या मॅडम त्या कुत्र्याच्या पिल्लाला ओरडत होत्या, "ए तू माझ्या बस मध्ये यायचं नाही " बोला आता..
      एकदा मी जिन्यातून जातांना मला म्हणाली," आज शाळा नाही का तुमची?" मी म्हटलं ,"आहे की. हि काय निघाले." तर म्हटली ,"आता कसं वाटलं??" म्हटलं ,"छान वाटलं. तू माझी एवढी चौकशी केली तर मला बरच वाटणार ना??" तर म्हणाली, "तुमची ताई कशी मला सारखी विचारते शाळा नाही का शाळा नाही का म्हणून.." म्हणजे तिने माझी चौकशी रागापोटी केली होती. पण हा राग नक्की कोणाचा माझा, ताईचा की शाळेबद्दलचा ते काही शेवट पर्यंत कळलं नाही.
       एकदा तर दोघी बहीणींची भांडणं झाली. रेवाच्या आईने सोडवण्याचा प्रयत्न केला तर ती काठी घेऊन आली आणि सरळ आईला म्हणाली, "तू आधी घराबाहेर हो" बोला आता...काय म्हणायचं या मुलांना??
           आमच्या कडे उन्हाळ्यात रोज रात्री कुल्फीवाला यायचा. पत्ते खेळतांना जो हरेल त्याने सगळ्यांना कुल्फी खिलवायची असा अलीखित नियमच होता. कुल्फीवाल्यालाही सवय झाली होती. एक दिवस काही कारणास्तव कुल्फी घेतली नाही. कुल्फीवाला सारखी घंटी वाजवत होता. माझ्या लहान भाच्याने घरात जाऊन माझ्या आईला सांगीतले. आई म्हणाली, "रोज रोज नाही घ्यायची कुल्फी." इकडे कुल्फीे घेत नाही असे बघुन कुल्फीवाला फाटकाजवळ येऊन जोरजोरात घंटी वाजवू लागला. त्यामुळे भाच्याला खुप संताप आला. तो त्या कुल्फीवाल्याला चिडून म्हणाला, "जावा की आमची आजी नाही म्हण्ती." त्याने आपला राग कुल्फीवाल्यावर काढला पण कुल्फीवाला कुणावर काढणार???
          एकदा एका लग्नात एका लहान मुलाला एक पांढरे केस झालेले काका चिडवत होते की तुझे बाबा म्हातारे झाले. बराच वेळ मुलानी ऐकून घेतलं. मनातून त्याला संताप येत असावा. परत ते काका म्हणाले, "अरे याचे बाबा म्हातारे झाले." मग तो चिडून बोलला, "सी यूवर 'केस' फर्स्ट" अन्  संतापाच्या भरात त्याला केसांना इंग्रजी शब्द आठवला नसावा.
         एकदा एका शाळेत पालकांना बोलावलं. त्यांना वाटलं आपल्या मुलाने नक्कीच काहीतरी चांगलं केलं असणार त्याचं कौतुक करायला बोलावलं असेल. पण शाळेतला किस्सा ऐकून ते उडालेच. त्यांच्या मुलाला म्हणे टिचर रागवल्या म्हणून तो त्यांना म्हणाला, "तुम्ही मला ओरडलात तर मी गोळ्या घालीन तुम्हाला." 
अशी ही मुलं काय बोलतील सांगता येत नाही. 
        एकदा आम्ही ट्रेनने जात असतांना एका सहप्रवाशाचा मुलगा तर खुपच भन्नाट. तो त्रास देतो म्हणून आईने वरच्या बर्थवर बसवलं. एक विक्रेता आला त्याच्या डोक्यावरील बास्केट मधून त्याने कोल्ड्रींकची बाटली वरच्यावर घेऊन फस्त केली आणि आईला आवाज द्यायला लागला, "मम्मी.... मम्मी...." मम्मीने चक्क दुर्लक्ष केलं तर सरळ सांगितलं, " मम्मी मैने कोल्ड्रींक पी लिया है उसके पैसे दे दो." आता काय म्हणणार मम्मीजी?? त्यांचीतर बोलतीच बंद झाली. 
          अशी ही गमतीदार मुले त्यांच्या वागण्याने जसा विनोद निर्माण करतात तसचं कधीकधी पालकांच्या तोंडाचं पाणीही पळवतात.
        
     

सौ. मंजुषा गारखेडकर
पोस्ट आवडल्यास कृपया नावासकट शेअर करावी ही विनंती