Thursday, 9 July 2020

मामाचा गाव भाग १


लहानपणी परिक्षा झाली रे झाली की मामा कडे जायचे वेध लागायचे. त्या आधीच आईच्या पापड, कुरड्या सगळं झालेलं असायचं. नागपूरहून आम्ही पॅसेंजर गाडीने निघायचो. आई, मावशी आणि आम्ही सगळे भावंड सोबत दोन लोखंडी ट्रंका, २/३ हँडबॅग , पाण्यासाठी सुरई किंवा कडीचा तांब्या इ. सगळं सामान घेऊन आम्ही स्टेशनवर दाखल व्हायचो. आमचे वडील आम्ही त्यांना दादा म्हणायचो ते आम्हाला स्टेशनवर सोडायला यायचे. तेंव्हा आज एवढी गर्दी नसायची. सगळं सामान ठेवून बसायला ऐसपैस जागा मिळायची. गाडी सुटली की दादा हात हलवत मागे जातांना दिसायचे. मग गाडीत आमचा धुडगुस सुरू व्हायचा. वरच्या बर्थवर बसून आम्ही पत्ते खेळायचो. दहा वेळा आईला पाणी माग खायला माग, वेळ कसा जायचा ते कळायचही नाही. रात्र झाली की आई बरोबर डब्यात आणलेले पराठे, काचऱ्याची बटाट्याची भाजी अन् ताजे करकरीत कैरीचे लोणचे द्यायची. जेवण झाली की गुडुप झोपायचं की सकाळी जलंब स्टेशनवर गाडी पोहोचलेली असायची. तिथे उतरायचं. प्रवासाचा एक टप्पा पार पडलेला असायचा. आता पुढची गाडी पकडणे हे उद्धीष्ट असायचं. ती गाडी कधीच वेळेत नसायची. वेळ मिळाला की डुलत डुलत यायची स्टेशनात. १०/११ वाजता त्यात बसलं की पुढचा प्रवास सुरू. सोबत आणलेल्या चिवडा आणि कणकीचे शंकरपाळे प्रवासात कधी फस्त व्हायचे कळायचं देखिल नाही. मग खामगाव आलं की उतरायचं. आता एस टी स्टँड वर जावं लागायचं. एकाने सतत एस टी च्या मागावर रहायचं. कोणी सांगितलं देऊळगावची एस टी आली की सगळ्या सामाना सकट धक्का बुक्की करत कसं बसं एस टी त चढायचं. जागा मिळेल याची कधीच शाश्वती नसायची. आत शिरायला मिळालं हेच महाभाग्य. दिवसभरातून एकच गाडी देऊळगावला जायची अन् ती ही गेली तर बोंबला. बरं त्या गाडीत चढतांना नेहमीच आमची सुरई फुटायची. देऊळगावचे रस्ते म्हणाल तर इतके भयंकर की शरीरातलं एकही हाड खिळखिळं झाल्याशिवाय रहाणार नाही. वाट पाहून पाहून कंटाळून डुलकी लागली की आई उठवायची चला आपल्याला उतरायचं आहे. संध्याकाळ झालेली असायली. मग सगळं सामान गोळाकरून एस टी गच्चकन थांबली की कोंबलेल्या त्या एसटी तून एकेकानी बाहेर येत मोकळा श्वास घ्यायचा. एस टी पुन्हा घुईं घुईं करत निघुन जायची. 
       स्टँड पासुन मामाचं घरं खुप जवळ नव्हतं शिवाय बरोेबर सामान म्हणून मामा घ्यायला यायचा. वाट पाहून पाहून मामा घरी निघून जायचा. मग कोणीतरी निरोप द्यायचा  " ए कांता तुया बयनी अाल्या" लगेच मामा गाडीला बैल जुंपुन बैलगाडी स्टँड वर घेऊन यायचा. मग त्यात ट्रंका, इतर सामान अन् बच्चे कंपनी म्हणजे आम्ही कोंबले जायचो. अन् मग चालली आमची वरात घराकडे. आई अन् मावशी पाई चालत यायच्या. गावातले रस्ते अन् आधीच खिळखिळी झालेली हाडं अन् त्यात ग्रामपंचायती जवळच्या नदीतील (उन्हाळ्यामुळे सुकलेली) गोल गोल दगडांमधून जातांना असं वाटायचं की आहे ती हाडं निसटून पडतील की काय. मग बैलगाडीतून उतरून पाई प्रवास सुरू व्हायचा.अंग धुळीनं माखलेलं असायचं. काल संध्याकाळी प्रवासाला निघालेलो आम्ही आज रात्र झाली तरी घरी पोहोचायचा पत्ता नसायचा. गावात लोकं अंगणात बाजा टाकून झोपायच्या तयारीत असायचे. गावात तेंव्हा लाईट नव्हते. लोक कंदील लाऊन गप्पा मारत बसलेले असायचे. चालता चालता कोणीतरी आपल्या तोंडाजवळ कंदील आणुन कोण आहे याचा तपास करायचे. कोणीतरी विचारायचं "कोन हाय?"  "डाक्टर सायबाच्या पोरी हायतं न शयरातून  आल्या." मग कोणीतरी "साजऱ्या हायत बाई नाती" असं म्हणत तोंडावरून हात फिरवायच्या. 
       चालत चालत रस्त्यात असंच सगळ्यांना भेटत घरी पोहोचायचं तोपर्यंत साडेनऊ दहा वाजलेले असायचे. घरी नाना (आजोबा), मोठी आई (अाजी), मामी सगळे वाट पहात असायचे. पण गावातल्या लोकांची आपुलकी अन् नाना, मोठीआई, मामा अन् मामींचं अगत्य यांनी सगळ्या प्रवासाचा शीण निघून जायचा.
    मामाकडे खुप मजा यायची. रोज पहाटे तिथे दिंडी यायची. शाळकरी मुले त्यांच्या शिक्षकां बरोबर मारूतीच्या देवळात आरती करायचे अन् मग श्लोक म्हणत गावातून प्रभातफेरी काढायचे. ती दिंडी आली कि आम्ही उठायचो मग अंगण झाडायचं, सडा टाकायचा, रांगोळी काढायची. हे सगळं घरी कधी करायला मिळायचं नाही. त्यामुळे मस्त वाटायचं हे सगळं करायला. 
        नानांकडे गेलं की रोजच आमरसाचं जेवण असायचं. आमची मोठीआई चुलीवर स्वयंपाक करायची. काय चव असायची त्या जेवणाला म्हणून सांगू. पण इतक्या सगळ्यांचा चुलीवर स्वयंपाक करायचा म्हणजे गंमत नाही हे आज कळतं. आमच्या येण्यामुळे मामीलाही खुप काम करावं लागायचं पण कधी चकार शब्दही काढला नाही मामीनी. 
      मामाची शेती होती त्यामुळे घरच्या भुईमुगाच्या शेंगा भरपूर असायच्या.घरी दोन तीन म्हशी होत्या त्यामुळे दुध, तूपाची काही कमी नसायची. आम्ही कधी कधी मामा बरोबर जायचो जनावरांच्या वाड्यात मामा दुध काढायला जायचा तेंव्हा. रोज रात्री आम्ही गच्चीवर झोपायला जायचो . मग तिथून  सप्तर्शी , शुक्र तारा बघत बघत झोपी जायचो. रात्री छान वाऱ्याची  झुळुक यायची. खुप छान होते ते दिवस. आजच्या A C ला ही त्याची सर येणार नाही.
      आमचे आजोबा म्हणजे नाना डॉक्टर होते त्यामुळे सकाळ संध्याकाळ दवाखान्यात पेशंट यायचे. गावात सगळे लोक ओळखीचे त्यामुळे दवाखान्यात मस्त गप्पा रंगायच्या. गावातल्या लोकांची खुप माया असायची. कोणी घरचं तांब्याभर दुध, कोणी घमेलंभर शेंगा, कोणी आंबे पाठवायचे आमच्यासाठी अन् चहाला बोलवणाऱ्यांची तर गिनतीच नसायची.
     बघता बघता सुट्टया संपत यायच्या अन् घरी जाण्याचे वेध लागायचे. मग मोठीआई घरच्या डाळी, शेंगा, तूप, पापड, लोणचं या सगळ्यांची बांधाबांध करायची आणि महिना दोनमहिने राहून तुप रोटी खाऊन छान गलेलठ्ठ झालेलो आम्ही घरी परतायचो.
       यासगळ्या आजोळपणात मामा-मामीचं खुप मोठं योगदान असायचं. ते आमच्यासाठी जे काही करायचे ते शब्दात सांगण अशक्यच. आज नाना , मोठीआई याजगात नाही पण ते मनात घर करून राहिलेले दिवस कधीच विसरता येणार नाही. अजुनही मी  देऊळगावच्या आठवणी रोज माझ्या लेकीला एेकवते अन् तीही आवडीने ऐकते.


सौ. मंजूषा गाखेडकर
पोस्ट आवडल्यास कृपया नावासकट शेअर करा 

2 comments: